धानोरा : जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील पोषण आहाराच्या तांदळासह इतर वस्तू लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडालेली आहे. येथे बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर केंद्रीय जीवन विद्यामंदिर जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेतील खोली क्रमांक एकमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शालेय पोषण आहाराच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. चोरट्यांनी पोषण आहार ठेवलेली खोलीची भिंत तोडून आत प्रवेश करीत, तीन गोण्या तांदूळ, तेलाचे १४ पाऊच तसेच मिरची, मसाला, हळदीची पाकिटे असा एकूण २५०० रुपये किमतीचा माल लंपास केल्याची घटना १५ ते १८ मेच्या दरम्यान घडली. आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शाळेजवळ असलेल्या केळीच्या शेतात चोरी झालेल्या तांदळापैकी काही तांदूळ सांडलेला दिसला. मजुरांनी ही गोष्ट शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकांच्या कानावर टाकली. त्यांनी शाळेत येऊन पाहणी केल्यावर शालेय पोषण आहाराची चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अंबादास नारायण पाटील यांनी अडावद पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल अकील शेख करीत आहेत. (वार्ताहर)
जि.प.शाळेतून पोषण आहार लंपास
By admin | Updated: May 19, 2014 02:10 IST