जळगाव : शासन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे विकणाऱ्या श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन अमळनेरचे मालक जितेंद्र दिनकर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि त्यांचा परवाना २५ मे पासून कायम स्वरुपी रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.
या दुकानात जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अरुण तायडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा रचून पाच हजार रुपये किंमतीचे पाच कापूस बियाणे पाकिटे जप्त केली होती. एचटीबीटी या अवैध कापूस बियाणापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरिकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड करु नये, या कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.