नशिराबाद : बेळी येथे बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या २ महिन्यांपासून बिबट्याकडून गुरांचा जीव घेणे सुरूच आहे. नुकताच बिबट्याने गाईचा फडशा पाडला आहे.
मागील आठवड्यात संजय काशिनाथ नारखेडे यांच्या गाईचा बिबट्याने फडशा पाडला. त्यानंतर १६ रोजी रात्रीच्या सुमारास निवृत्ती त्र्यंबक कुरकुरे यांची गाय बिबट्याने खाल्ली. असे असताना वन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गाव बिबट्याच्या दहशतीचे बळी ठरत आहे. याबाबत मनसेने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. परंतु संबंधीत अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी केला असून संबंधीत विभागाने बिबट्याला लवकर जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.