जळगाव/पुणे : बीएचआरमध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत घ्यायला आलेल्या ठेवीदारांना अवसायक जितेंद्र कंडारे याने प्रचंड त्रास दिला आहे. कार्यालयात येणाऱ्या कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते. दिवसभर बाहेर बसवून ठेवत. तेथील कर्मचारी कागदपत्रेही खिडकीतून लोकांवर फेकून देत. असहाय्यपणे कोणी त्यांना म्हटला की आता फाशीच घेतो, तर ते निदर्यतेने वागत होते. फाशी घेतो म्हणणाऱ्यांना कंडारे हा ते बघ समोर झाड आहे. जा जाऊन फाशी दे, असे म्हणत असल्याचा अनुभव सचिन दोशी यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील बीएचआर पतसंस्थेने सुमारे सव्वातीन कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. गेल्या १० दिवसात त्यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह इतरांचे पैसे परत केले आहेत. आतापर्यंत जवळपास पावणे दोन कोटी रुपये कंपनीने परत केल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे अन्य कंपन्यांनी ठेवीदारांचे उरलेले पैसे परत दिले तर ते कारवाईपासून वाचू शकतील, असे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले व संदीप भोसले यांनी सांगितले.
११ जणांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद सुरू
बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या सुनील झंवर याने पुन्हा पुणे विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर १२ जुलै रोजी कामकाज होणार आहे. दरम्यान, अटकेतील बड्या ११ कर्जदारांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे युक्तिवादाला सुरुवात झाली. त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपलेला असून काहींनी कर्ज भरण्याची तयारी दर्शविली असली अद्याप पुढे काहीच झालेले नाही. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.
गुंतवणूकदारांचे परत केले १०० टक्के पैसे
बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांचे केवळ ४० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १००टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेणाऱ्या कंपनीने अटकेच्या भीतीने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ६४ ठेवीदारांचे उरलेले ६० टक्के त्यांच्या बांधावर जाऊन परत केले. या ठेवीदारांचे सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये परत केले असून ठेवीदारांना शोधून आता ते पैसे परत करत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांना एकामागोमाग अटक करण्यास सुरुवात केल्याने हे घडून आले आहे. पुणे पोलिसांमुळेच आम्हाला पैसे परत मिळाले, अशी भावना या ठेवीदारांनी व्यक्त केली आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे बीएचआर पतसंस्थेची शाखा २०१३ मध्ये सुरू झाली होती. या पतसंस्थेत तेथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी प्रामुख्याने या पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. २०१४ मध्ये ही पतसंस्था बंद पडली. त्यानंतर पैसे मिळविण्यासाठी या शेतकऱ्यांनी जळगावला जाऊन बीएचआरच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या. परंतु, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने त्यांना कार्यालयातही येऊ दिले नाही.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पैसे परत
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या महिन्यात निमगाव केतकी येथील ठेवीदारांच्या घरी जाऊन त्यांच्या ठेवींविषयीची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक भोसले व त्यांच्या पथकाने बीआरएचमध्ये गुंतवणूक केलेल्यांची यादी तयार करून त्यांचे जबाब नोंदविले. त्याचबरोबर या ठेवीचे ४० टक्के पैसे देऊन १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेणाऱ्या ओम शिवम बिल्टकॉन या कंपनीच्या लोकांचेही जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांनी दुसऱ्यांदा कारवाई करून आणखी काही जणांना अटक केली. तसेच इंदूरहून जितेंद्र कंडारे यालाही अटक केली. त्यामुळे ज्यांनी अशा प्रकारे ठेवी घेतल्या होत्या. त्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे या कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकांना त्यांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली.