कजगाव, ता. भडगाव : तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दि. ११ रोजी कृषिमंत्री दादा भुसे कजगाव येथे आले होते. या वेळी कजगाव ग्रामपंचायतीच्यावतीने कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील, तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, कृषी अधिकारी बी. डी. गोरडे, शिवसेना जि. प. गटनेते रावसाहेव पाटील, डॉ. विशाल पाटील, अंबादास सोमवंशी, शेतकरी रामसिंग पाटील, भूषण पाटील, शिवसिंग पाटील, नारायण पाटील, मानसिंग पाटील उपस्थित होते.
कजगाव येथे एकाच वर्षी दोनदा आलेल्या महापुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास महापुराने हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
कजगाव ग्रा. पं.ने दिलेल्या निवेदनात अतिवृष्टीमुळे स्मशानभूमीच कंपाऊड व तितूर नदीच्या केटीवेअरचा भराव वाहून गेला. तसेच कजगाव टाकळी मार्गावरील फरशी पूलही वाहून गेला आहे तर आठवडे बाजार जवळ असलेल्या नाल्याला संरक्षण भिंत बसवण्याची मागणी ग्रा. पं.च्या वतीने करण्यात आली आहे.