जामनेर : शहरातील विविध भागात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहे. खासगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला व तापाच्या रुग्णात वाढ झाल्याने, रुग्णालये फुल्ल झालेली दिसत आहे. उपजिल्हा रुग्णालयात दररोज ४५० ते ५०० रुग्णाची बाह्य रुग्ण विभागात नोंदणी होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. वीस दिवसांच्या खंडानंतर अचानक पावसाचे आगमन झाल्याने वातावरणही बदलले. याचा परिणाम मुख्यत्वे लहान मुलांवर दिसून येत आहे.
सततच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी चिखल वाढला असून, साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची संख्याही वाढली आहे. शहरात सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णाची संख्या वाढली असून, काही रुग्णात प्लेटलेस वाढल्याचेही दिसून येत आहे. मात्र, हे प्रमाण कमी आहे. बदलत्या वातावरणामुळे असे होते. नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ.राजेश सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, जामनेर.