ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - विजयादशमीला जळगाव येथे नागरिकांच्या प्रचंड गर्दीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. विजयादशमीनिमित्त एल. के. फाऊंडेशनतर्फे मेहरुण तलाव परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांच्यासह आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, खान्देश विकास आघाडीचे गटनेते सुनील महाजन, जि.प. चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, तहसीलदार अमोल निकम, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी महापौर आशा कोल्हे, सदाशिवराव ढेकळे, माजी नगराध्यक्षा सिंधू कोल्हे, विजय कोल्हे, रत्नाभाभी जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्याहस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात येवून मुख्य उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ललित कोल्हे यांना महापौरपदाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व विविध प्रगीची कामे साधून जळगावचे नाव देशात चमकवावे, असे आवाहन त्यांनी महापौर कोल्हे केले. या वेळी एल्फीस्टन येथील दुर्घटेतील मृतांना तसेच जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर रावण दहन करण्यात आले. यादरम्यान सुमारे 15 मिनिटे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रम पाहण्यासाठी मेहरून तलावाच्या तिन्ही बाजूला प्रचंड गर्दी झाली होती.