लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने, महामार्गाच्या कामाची चांगलीच दाणादाण उडविली आहे. शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायापासच्या कामावर या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्या महामार्गाच्या कामासाठी ममुराबादजवळ लेंडी नाल्याच्या वर पाइप टाकून कच्चा पूल बांधण्यात आला होता. मात्र, या कच्च्या पुलावर टाकलेला माती आणि मुरुमाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक रस्त्याच्या कामात अडचणी येत आहेत.
तरसोद ते फागणे या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात गेल्या काही दिवसांपासून अनेक अडथळे येत आहेत. हा टप्पा ९० किमीचा आहे. त्याची किंमत १,०२२ कोटी रुपये आहे. कोविड १९ मुळे दोन वेळा अडचणी आल्या. त्यामुळे सुरू असलेल्या सर्वच कामांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. हे काम आधीच संथ गतीने सुरू आहे, तसेच काही महिने आधी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला महामार्ग प्राधिकरणाने दंड ठोठावला होता. त्यानंतर, कामात गती आली. मात्र, लगेचच लॉकडाऊन लागले. त्यात मजूर गावी परतल्याने, या रस्त्याचे काम पुन्हा एकदा संथ गतीने होऊ लागले. आता रविवारच्या पावसाने बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कचरा अडकला पाइपमध्ये
शहरातील निम्म्यापेक्षा जास्त सांडपाणी लेंडी नाल्यात सोडले जात होते. बायपास रस्त्यात हा नालाही येतो. त्यामुळे तेथे लहान पूल बांधावा लागणार आहे. ठेकेदाराने या लेंडी नाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात पाइप टाकले आणि वर मुरुम टाकून रस्ता केला होता. मात्र, शहरातून आलेले प्लास्टीक आणि इतर कचरा या पाइपमध्ये अडकला आणि पाण्याच्या लोंढ्याने वर असलेला सगळा मुरुम वाहून नेला आहे.
शेतांमध्ये गेले नाल्याचे पाणी
नाला ओलांडण्यासाठी जेथे पुल केला जाणार आहे. तेथे सध्या महामार्ग प्राधिकरणाने चार ते पाच सिमेंटचे ड्रेनेज पाइप टाकले आहे. मात्र, या पाइपमध्येही कचरा अडकला. त्यामुळे येथे पाणी साठले आणि हेच पाणी आसपासच्या काही शेतांमध्येही शिरले.