गोसेवाचा सरळ अर्थ हा आहे की, गायींना खाऊ घालणे, चनाडाळ, गूळ, लापशी, हिरवा चारा, ढेप खाऊ घालणे. त्यात त्यांनी सुरुवातीला सर्व जातीच्या लोकांना एकत्र केले आणि गोसेवा करण्यासाठी शहराच्या मध्यभागी असलेली पांझरपोळ ही संस्था निवडली. तेथील देशी वाणाच्या गायींना खाऊ घालणे हीच गोसेवा बनली. महेशनवमी, अग्रसेन जयंती, संत नरहरी सोनार जयंती, पर्युषण पर्व अशा सर्व पंथांच्या प्रमुख मानल्या जाणाऱ्या दिवशी त्या जातीच्या किंवा पंथाच्या अनुयायांनी जाऊन गोसेवा केली पाहिजे हा संदेश त्यांनी त्यांच्या मनात रुजवला. आणि त्यात त्यांना यशही आले.
गोसेवेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ॲड. काबरा यांना यश आले. त्यानंतर हळूहळू त्यांनी आपले हे व्रत इतर धर्मीयांच्या अंगीदेखील बाणवले. गेल्या काही वर्षांपासून रमजान महिन्यात मुस्लीम बांधव रोजा सोडण्याआधी गोसेवा करतात आणि मग रोजा सोडतात. बोहरा समाजबांधवांनीदेखील गोसेवा करूनच रोजा सोडला होता. त्यासोबतच शीख बांधवही नियमितपणे गोसेवा करतात. त्यात ख्रिश्चन धर्माचे अनेक अनुयायी सातत्याने फादर शशिकांत वळवी यांच्यासोबत येऊन पांझरपोळमध्ये गोसेवा करत आहेत. स्वत: ॲड. विजयकुमार काबरा हे नेहमीच आपल्यासोबत चनाडाळ आणि गूळ ठेवतात. गाय दिसली की त्या गायीला ते खाऊ घालतात, सर्वांनी देशी गायींची जोपासना करावी, असेही ॲड. विजयकुमार काबरा सांगतात.
पंचगव्याचे महत्त्व
गायीच्या पंचगव्याचे मोठे महत्त्व आहे. त्यातील गोमुत्र, गायीचे दूध, तूप, दही आणि शेण यांची आपल्याला गरज असते, असेही काबरा म्हणतात.
गोमातेचे अनन्य महत्त्व
गोसेवेदरम्यान ॲड. विजयकुमार काबरा यांनी येथे आलेल्या प्रत्येक समूहासमोर तसेच अनेक ठिकाणी जाऊन गोसेवा एक अनुष्ठान या विषयावर व्याख्यान दिले आहे. धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, शास्त्रीय, सांसरिक या जीवनाच्या विविध अंगांमध्ये गोमातेचे महत्त्व किती आहे, हे ते आपल्या भाषणात स्पष्ट करतात.