जळगाव : भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात अनंत चतुर्दशीला रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. याठिकाणी भाविकांना विसर्जन आरती करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच युवाशक्तीचे ५० स्वयंसेवक, एक पुजारी, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे १५ कर्मचारी, वाहतूक पोलीस शाखेचे तीन कर्मचारी, महापालिकेचे पाच स्वच्छता दूत हे भाविकांना सहकार्य करतील.
गेल्या वर्षीदेखील युवाशक्तीने राबवलेल्या उपक्रमात २,५०० गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या होत्या आणि तलावात त्यांचे विधिवत विसर्जन करण्यात आले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्रावर घरातील गणेश मूर्ती अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.