कळमडू, ता.चाळीसगाव : रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने मोटरसायकलवरून जाणार्या पती-पत्नीस जबर धडक दिली. यात पत्नी जागेवरच ठार झाली तर पतीचा धुळे येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. ही दुर्घटना मेहुणबारा येथील गिरणा पुलाजवळ रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली. कळमडू येथील साहेबराव दीपा सोनवणे (वय ५६) व त्यांची पत्नी निंबाबाई साहेबराव सोनवणे (वय ५०) हे चाळीसगाव येथे लग्नासाठी गेले होते. चाळीसगावहून कळमडू येथे परत येत असताना गिरणा पुलाजवळील वळणावर समोरून येणार्या वाहनाने कट मारल्याने साहेबराव सोनवणे व निंबाबाई सोनवणे हे रस्त्यावर पडले. त्याचवेळी भरधाव येणार्या दुसर्या अज्ञात वाहनाने या दाम्पत्याला चिरडले. पत्नी निंबाबाई सोनवणे ह्या जागेवरच मरण पावल्या तर पती साहेबराव सोनवणे यांना धुळे येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू आला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार साहेबराव सोनवणे व निंबाबाई सोनवणे यांनी काबाडकष्ट करून त्यांच्या दोन भावांसह स्वत:ची प्रगती केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पतीचे शवविच्छेदन धुळे जिल्हा रुग्णालयात तर पत्नीचे चाळीसगाव नगरपालिका रुग्णालयात करून नंतर या दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात कळमडू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
पती-पत्नीवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
By admin | Updated: May 19, 2014 02:07 IST