वरणगाव : येथील मकरंदनगर व अयोध्यानगरमधील नागरिकांची दोन वर्षांपासूनची ढाप्याची समस्या अखेर माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्वखर्चाने सोडविली.
या नगरातील काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या एका शिक्षकाच्या अंत्यविधीच्यावेळी वरणगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी उपस्थित होते. त्यावेळी अयोध्यानगरकडून मकरंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जवळजवळ दोन वर्षांपासून तुटलेल्या ढाप्याची तक्रार नागरिकांनी त्यांच्याजवळ केली .व गेल्या दोन वर्षात अनेकदा नगरपरिषदेकडे पत्र व्यवहारही केला वारंवार तक्रार करून देखील सदरची समस्या सुटत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. तेव्हा १५ दिवसात तुमचं काम होऊन जाईल, काळजी करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याच दिलेल्या शब्दाला जागून सदरील वाॅर्डाचे ते नगरसेवक नसताना, नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी सदर ढाप्याचे काम त्यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यानिमित्त अयोध्यानगर व मकरंदनगरमधील नागरिकांनी त्यांच्या छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
हिरामण बाऊस्कर, चंद्रकांत झांबरे, गोपाळ पाटील, दिलीप चौधरी, अनिल सोनवणे, निलेश बाऊस्कर व राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, अतुल शेळके आदी यावेळी उपस्थित होते.