जळगाव : शेतात मोबाईल टॉवर तयार करण्याचे आमिष दाखवून नोंदणी फी, कोर्ट अँग्रिमेंट या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम वसूल करीत फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे. याचा फटका सावदा येथील एका माजी नगरसेविकेसह अनेकांना बसला असताना पोलिसांकडून गुन्हा दाखल न करून घेता केवळ चौकशीचे कागदी घोडे नाचविले जात आहे.माजी नगरसेविकेची फसवणूकसावदा येथील एका माजी नगरसेविकेने वृत्तपत्रातील जाहिरातीच्या आधारे पॉलिसी टॉवर सिस्टीम या कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर एक तासात कंपनीकडून फोन आला आणि मोबाईल टॉवरसाठी तुमच्या शेतजमिनीची निवड झाली असल्याचे सांगत नोंदणी फी म्हणून दोन हजार ७५0 रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर त्याची रितसर पावती व मोबाईल टॉवरच्या करारासंबंधितची विस्तृत माहिती त्यांच्या ई-मेल वर पाठविण्यात आली. त्यानंतर चार फोटो, रेशन कार्ड, फोर-जी टॉवर लावण्यासाठी कोर्ट अँग्रिमेंटचे शुल्क म्हणून १९ हजार ८५0 रुपये पाठविण्यास सांगितले.रक्कम दीड लाखांपर्यंतकंपनीने सांगितलेली रक्कम भरल्यानंतर अँड.सोनूकुमार या नावाच्या व्यक्तीने फोनद्वारे काही सूचना केली. त्यानुसार एसबीआयच्या खात्यातून धनादेशाद्वारे रक्कम अदा केली. त्यानंतर १५ हजारांच्या स्टॅम्पवर, तामिळनाडू कोर्टाच्या अँग्रिमेंटच्या सर्व अटी आणि शर्ती ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या. कंपनीकडून मागणी वाढतच असताना माजी नगरसेविकेच्या कुटुंबीयांकडून तब्बल एक लाख ५0 हजार रुपयांची रक्कम बँकेत भरण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने पैसेही पाठविले नाही आणि टीमदेखील आली नाही. फसवणूक झालेल्या माजी नगरसेविकेने संबंधित मोबाईल नंबरवर संपर्क साधला, मात्र तेदेखील बंद येऊ लागले. काही दिवसांनंतर वृत्तपत्रातील मोबाईल टॉवरच्या जाहिराती बंद झाल्या.पोलिसांकडून चौकशीचा फार्सआपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माजी नगरसेविकेने सावदा पोलीस स्टेशनला धाव घेतली. संबंधित कंपनीचे मोबाईल नंबर, अकाऊंट नंबर दिले. मात्र केवळ चौकशी करून पोलिसांनी तक्रारदारांना नंतर बोलवितो असे सांगितले. घटनेला तब्बल एक महिना झाला मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. ज्या वृत्तपत्रात जाहिरात आली त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली. त्या ठिकाणीदेखील जाहिरातीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
------------------
मोबाईल टॉवरसोबत नोकरीचे आमिषमोबाईल टॉवरच्या नावाखाली शेतकर्यांची फसवणूक सुरू असताना काही ठगांनी फसवणुकीचे नवीन फंडे शोधून काढले आहेत. जॉब प्लेसमेंटसाठी काही कंपन्यांकडे नोंदणी करणार्या विद्यार्थ्यांना नोकरी लावून देण्यासाठी नोंदणी फी आणि इतर चाज्रेसच्या नावाखाली तीन हजारांची रक्कम भरण्यासाठी आग्रह केला जात आहे. या बदल्यात दोन्ही विद्यार्थ्यांना मोठय़ा पगाराचे आणि पॅकेजचे आमिष दाखविले जात आहे. जळगावातील दोन विद्यार्थ्यांना गेल्या तीन दिवसांपासून असे मोबाईलवर कॉल येत आहेत. या विद्यार्थ्यांनी याबाबत बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार केली आहे. मोबाईल टॉवर कंपनीकडून स्थानिक व नामांकित वृत्तपत्रांमध्ये मोबाईल टॉवरसाठी जागा पाहिजे अशा प्रकारे ठळक स्वरूपात जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत शेत किंवा प्लॉटवर थ्री-जी अथवा फोर-जी टॉवर खात्रीने लावण्यासाठी आवाहन केले जाते. त्यासाठी जागेच्या भाडेस्वरुपात एक कोटी ३0 लाख रुपयांची आगाऊ रक्कम देण्याचे आमिष दाखविले जाते. यासह मोबाईल टॉवरवर दोन किंवा तीन जणांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले जात असते. जमीनमालकाचा कंपनीवर विश्वास बसावा यासाठी आयएसओ सर्टिफाईड असल्याचा दावा केला जातो. तसेच कोर्टाच्या अँग्रिमेंटसाठी आग्रह धरण्यात येत असतो.