जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आता लहान बालकांनाही डेंग्यूने लक्ष केले असून जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, भडगाव आणि जळगाव शहरातील पाच बालकांना डेंग्यूची लागण झाली आहे.
डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये एरंडोल तालुक्यातील आनंदनगर येथील रोशनी जगन राठोड या साडेचार महिन्याच्या नवजात बालिकेसह प्रिती एकनाथ तोमर(७ वर्ष), रा.तोरणमाळा, ता.जामनेर, दिशा प्रकाश वाघ(२ वर्ष), रा.येवती, ता.बोदवड, विशाल संजय गायकवाड (८ वर्ष), रा.तरोडा,ता.मुक्ताईनगर आणि प्रियंका गणेश पाटील(६ वर्ष)रा.पाचोरा या बालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात उपचार सुरू आहेत. जिल्हाभरात वातावरण बदलामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून त्यांच्या डंखामुळे डेंग्यू व तापाचे रुग्ण वाढले आहेत. जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी नशिराबाद येथील मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.डेंग्यूसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागातर्फे काही डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. शहरात जिल्हा रुग्णालयाव्यतिरिक्त खाजगी रुग्णालयातही डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाला डेंग्यूला रोखण्यात यश आलेले नाही. जुन्या गावातील युवकाचा मृत्यू
जुन्या जळगावात खेडी रोडजवळ रहाणार्या अनिल देविदास बाविस्कर(२३)या युवकाचा दुपारी ४.३0 वाजेच्या सुमारास वाल्मीकनगरातील बगीच्यामध्ये उलट्या झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. तो बळीरामपेठेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. आठ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मात्र त्याने काहीतरी खाल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा होती.