जळगाव : कार्यकर्ते आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून हे सरकार पडणार आहे, आपण सत्तेत येणार आहोत, असे विरोधकांना सांगावे लागत आहे. मात्र, आपल्या सरकारचे ५ वर्षे आरामात पार पडतील. यांना ‘पुन्हा येईल, पुन्हा येईल’ करतच रहावे लागेल. यांच्या अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली. पण, अहंमपणा अजूनही गेलेला नाही, असा टोला एकनाथ खडसेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन करताना विरोधकांना चिमटे काढले.
एकजुटीने काम करावयाचे आहे
वर्तमानपत्रात कधी काही आले तर पॅनिक होऊ नका. वर्तमानपत्रात कधी चांगले तर कधी वाईट येते. वर्तमानपत्रात कधी काय येते, याचा मला गेल्या ४० वर्षांत चांगला अनुभव आहे. आपलं काम सोडू नका. आपल्याला एकजुटीने काम करायचे आहे, असेही खडसे म्हणाले. त्यानंतर अरुणभाई गुजराथी यांनी मार्गदर्शन केले. हे सरकार पाच वर्षे टिकरणार असून सर्वांनी एकत्र येवून काम करायचे आहे. राजकारण घडू शकते पण घडविण्याची क्षमता पाहिजे, असे ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, गफ्फार मलिक, अरुण पाटील, दिलीप वाघ, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.