लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब स्थलांतरसाठी मनपाने महावितरणकडे निधी वर्ग करूनदेखील महावितरणने अद्यापही कामाला सुरुवात केलेली नाही. सोमवारपासून या कामाला सुरुवात होईल असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सोमवारीदेखील या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. आधी निधी नसल्याचे कारण देत हे काम रखडले होते. आता निधी वर्ग होऊनही कामाला टाळाटाळ का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, महावितरणकडून कामे करताना त्याची स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती दिली जात नाही. त्यामुळे भविष्यात जागेच्या विस्ताराचा विषय येताच अडचणी समोर दिसतात. त्यामुळे आगामी काळातील समस्या टाळण्यासाठी महावितरणने विद्युत खांब स्थलांतराचे काम करण्यापूर्वी स्थळ निश्चिती करावी असे पत्र मनपा प्रशासनाने महावितरणला दिले असून, महावितरणने त्यानंतरही दुर्लक्ष केल्यास कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा असा निर्णय सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, मनपाने पत्र पाठवूनदेखील महवितरणे स्थळ निश्चितीबाबत मनपाला कळविलेले नाही. त्यामुळे हा वाद पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.