जळगाव : नादुरुस्त रस्ते, खड्डे आणि धुळीने जळगावकर हैराण आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री जळगावात असतानासुध्दा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा गावात पाणी नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे मत वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
वंचित बहुजन युवक आघाडीच्यावतीने राज्यभरात युवक जोडो अभियान राबविण्यात येत आहे़ उत्तर महाराष्ट्रात या अभियानाला सोमवारपासून जळगावातून सुरुवात झाली. त्यानिमित्ताने नीलेश विश्वकर्मा जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
याप्रसंगी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोळे, चेतन गांगुर्डे, जितरत्न पटाईत, राज्य सदस्या शमिभा पाटील, विनोद सोनवणे, प्रमोद इंगळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी काही करून दाखविण्यासाठी युवकांना आघाडीशी जोडून घेतले जात आहे़ प्रत्येक निवडणूक लढविली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून तरुणांची संवाद साधणार असल्याचे नीलेश विश्वकर्मा यांनी सांगितले. जळगाव, धुळे, नंदुरबार येथेही हे अभियान राबविले जाईल़ त्याचबरोबर सध्या जळगावकर विविध समस्यांनी त्रस्त आहेत़ त्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही विश्वकर्मा यांनी सांगितले. युवक जोडो अभियानाच्या माध्यमातून सर्व समाजातील युवकांना संधी दिली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणीची सुविधासुध्दा युवकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्यथा राजीनामा द्या...
जळगावकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मनपा व सत्ताधारी सपशेल फेल ठरले आहे. समस्या सोडविता येत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नुकतेच वीज बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन कापल्या गेलेल्या एका गावातील ५२ घरांचे कनेक्शन आघाडीने जोडून दिले. जळगावातही तसे झाले तर कनेक्शन जोडून देण्यासाठी आघाडीतर्फे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.