लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील ४ कोरोना बाधितांचा मंगळवारी मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या ५६२ वर पोहोचली आहे. नवे ३३ रुग्ण आढळून आले असून ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोराेनाचा आलेख घसरत असता मृत्यूची संख्या मात्र, दिवसभरात वाढली आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत चाळीसगाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढली असून या ठिकाणी सर्वाधिक ८६० सक्रिय रुग्ण आहेत.
शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. संसर्गाचे प्रमाण झपाट्याने घसरत असून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिकच आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ५५६ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आरटीपीसीआर चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी ही घटली आहे. मंगळवारी १८७२ अहवाल समोर आले असून त्यात ८९ बाधित रुग्ण समोर आले हे प्रमाण ४.७५ टक्के असून ॲन्टीजनच्या ४८३० चाचण्या झाल्या आहेत यात २०२ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण ४.१८ टक्के आहे. एकत्रित बाधितांचे प्रमाण हे ४.३४ टक्के आहे. याचा अर्थ संसर्गाचे प्रमाण हे घटले आहे. आधी शंभर अहवालांमध्ये १६ लोक बाधित आढळून येत होते. तेच आता ४ ते ५ लाेक बाधित आढळून येत आहेत. मात्र, कोरोनाच्या नियमांमध्ये नागरिकांनी कुठलाही निष्काळजीपणा करता कामा नये, असा इशाराही दुसरीकडे डॉक्टरांकडून दिला जात आहे.
५०० ने घट
सक्रिय रुग्णांमध्ये एकाच दिवसात ५२२ ने घट झाली आहे. नवे रुग्ण व बरे होणारे रुग्ण यात तब्बल ५१४ चे अंतर असून हा दुसऱ्या लाटेतील उच्चांक मानला जात आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता ६६८७ वर आली असून यातील १३०० रुग्णांना विविध लक्षणे असून त्यापैकी ७०० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. तर ३८३ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत.