जळगाव : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, गावाकडे परतलेले नागरिक आता पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. शासनाने अनलॉक केल्यामुळे परप्रांतातून येणाऱ्या बांधवांसह स्थानिक नागरिकही आपल्या कुटुंबासह रोजगारासाठी मुंबई, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश या भागामध्ये परत येऊ लागले आहेत. विशेष: विदेशात नोकरीसाठी वास्तव्य करणारे नागरिकही आता परतू लागले आहेत. यामध्ये मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.
शासनाने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू केला होती. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले होते. यामुळे मुंबई, पुण्यासह परप्रांतात काम करणारे अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह गावाकडे परतले होते. मात्र,महाराष्ट्रातील सर्व ठिकाणची कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर, पर प्रांतीय बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येत असतांना, दुसरीकडे स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबासह पुन्हा मुंबई, पुणे व परराज्यात कामासाठी परत येत आहेत. यामुळे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेनंतर हजारो बांधव मुंबई-पुण्याकडे गेले असल्याचे संबंधित विभागांतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
परदेशात ५० हून अधिक नागरिक गेेले
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परदेशात नोकरीला असणारे अनेक नागरिकही मायदेशी परतले होते. मात्र, विदेशातही कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यानंतर अमेरिका, इटली, ब्रिटन या ठिकाणी पुन्हा नागरिक रवाना होत आहेत. जळगावात पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळे, पासपोर्ट नवीन काढणे व नुतनी करणासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. त्यावरून सध्या ५० पेक्षा अधिक जण हे विदेशात गेले असल्याचे पासपोर्टच्या सुत्रांनी सांगितले.
इन्फो :
पर राज्यातही गेले २० हजार बांधव
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भितीने सुरत, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, खंडवा, बऱ्हानपूर या ठिकाणाहूनही हजारो नागरिक गावाकडे परतले होते. मात्र, गेल्या महिन्यापासून कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, गावी आलेले हे बांधव पुन्हा आपआपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहे. विशेष म्हणजे गुजरात व मध्यप्रदेशात जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक तिकीट बुकींगही जळगाव व भुसावळहून झाल्यामुळे, गेल्या महिनाभरात २० हजाराहून अधिक बांधव पर राज्यात रवाना झाले आहेत.
इन्फो :
सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे
कोरोनामुळे गेल्या वर्षी आणि यंदा दुसऱ्या लाटेच्या भितीनेदेखील मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास असणारे अनेक नागरिक गावाकडे परतले होते. दुसरी लाट संपल्यानंतर हे नागरिक पुन्हा आपल्या कुटुंबासह पुणे व मुंबईकडे परतू लागले आहेत. रेल्वे सुत्रांनी व खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी त्यांच्याकडे महिनाभरात झालेल्या तिकीट बुकींग नुसार ४० हजाराहून अधिक नागरिक मुंबई व पुण्याकडे रोजगारासाठी पुन्हा परतले आहेत.
इन्फो :
मुले परदेशात, चिंता भारतात..
आधीच मुले नोकरीनिमित्त परदेशात असल्यामुळे, ती चिंता लागूनच असते. त्यात आता कोरोना सारखे आजार आल्यामुळे, खुपच चिंता वाटते. मुले भारतात राहिल्यावर तात्काळ भेटण्यासाठी निघता येते. विदेशात राहत असल्याचे म्हटल्यावर लगेच पोहचण्यासारखे नसते. त्यामुळे माझा मुलगा अमेरिकेत असल्यामुळे, त्यांची सतत काळजी वाटत असते.
चंद्रकला महाले