खिर्डी : गणेशोत्सव दरम्यान होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्था व सिव्हिल सोसायटी वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हतनूर जलाशयावर गणपती व निर्माल्य संकलन मोहीम हाती घेण्यात आली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी जलाशयालगतच्या वरणगाव, टहाकळी, सावदा, फैजपूर, तांदलवाडीसह अनेक लहान-मोठ्या शहर व खेड्यापाड्यांवरील सार्वजनिक तसेच घरगुती गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी हतनूर धरणासमोरील पुलाच्या दोन्ही बाजूने गणेश विसर्जन करण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पाश्वभूमीवर वरणगाव पोलिसांनी टहाकळी फाट्यानजीक कडक बंदोबस्त ठेवून गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना निर्माल्य व गणेश मूर्ती चातक व सिव्हिल सोसायटीने राबविलेल्या उपक्रमास सहकार्य करण्यासाठी आवाहन केले. नदीपात्रात टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याला आळा बसावा यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्था व सिव्हिल सोसायटी वरणगावच्या कर्मचाऱ्यांनी भरउन्हात सकाळी दहा वाजेपासून रात्रीच्या आठ वाजेपर्यंत दहा तासांत दहा टन निर्माल्य व गणेश मूर्ती संकलनाला सुमारे २५ स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.
हतनूर धरणावर गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक व मंडळांना चातक व सिव्हिल सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी निर्माल्य नदीत टाकल्याने तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. तसेच जनजागृती व प्रबोधनात्मक निर्माल्य संकलनाचे फलक लावण्यात आले. ‘पीओपी’च्या मूर्ती न घेता, शाडू मातीच्या मूर्ती घेण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण निर्माल्य संकलन करून प्लॅस्टिक, नारळ, हार, फुले तसेच जुन्या मूर्ती हे वेगवेगळे करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच फुलांपासून विघटन करून गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरून वृक्षसंवर्धनासाठी उपयोगी आणण्यात येणार आहे.
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, समीर नेवे, विनायक सपकाळे, मनोज बडगुजर, संजय पाटील, प्रशांत पाटील, सौरभ महाजन, पियूष महाजन, पार्थ बऱ्हाटे तसेच वरणगाव सिव्हिल सोसायटीचे डॉ. राहुल भोईटे, रामचंद्र पाटील, पुष्कर भोईटे, नीलेश झोपे, ज्ञानेश्वर पाटील, श्रीराम सनंसे आदी कर्मचारी उपस्थित होते.
गणपती संकलन करताना चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रशांत पाटील, संजय पाटील आदी.