धुळे : शहरात तीन आठवड्यापासून जाणवणार्या पाणीटंचाईचे पडसाद आज महासभेत उमटले. मुस्लीमबहुल वस्तीतील नगरसेवकांनी महासभा सुरू होताच हंडे घेऊन पाणीप्रश्न सोडविण्याची जोरदार मागणी केली. तब्बल वीस मिनिटे वादग्रस्त चर्चा होऊन पाणीप्रश्नावर स्वतंत्र चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नगरसेवकांनी मोर्चा मागे घेत सभागृहात पदार्पण केले. महापौर जयश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा झाली. सभा सुरू होताच नगरसेवक फिरोज शेख, अमीन पटेल, जुलाह रश्मी बानो, अशरद शेख, साबीर पत्रकार आदी नगरसेवकांनी हंडे घेऊन महासभेत प्रवेश करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. सत्ता असूनही पाण्यासाठी आंदोलन करावी लागत असल्याची खंत फिरोज शेख यांनी व्यक्त केली. उपमहापौर फारूख शहा व सभागृहनेते कमलेश देवरे यांनी आंदोलनकर्ते नगरसेवकांशी चर्चा केली. विषय पत्रकेवरील विषय झाल्यानंतर पाण्यावर पुन्हा चर्चा करण्यात आली. आत्मदहनाचा ईशारा मायक्रो जलकुंभावर पंपींग स्टेशन नाही. त्यामुळे पुरेशे पाणी नागरिकांना मिळत नाही. हे पपींग स्टेशन ३१ मेपर्यंत बसविण्यात आले नाही तर मनपात आत्मदहन करण्याचा इशारा फिरोज शेख व अमीन पटेल यांनी दिला. पाण्यासाठी वनवन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम मनपा प्रशासनाचे आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी येत नाही. जे पाणी येते तेही दुर्गंधीयुक्त असते, असे मायादेवी परदेशी यांनी सांगितले. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अधिकारी मोबाईल उचलत नाहीत. आयुक्त लक्ष देत नाहीत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा. प्रशासनाने जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे विरोधी पक्षनेते गुलाब माळी म्हणाले. पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. प्रभागातील हातपंपही बंद आहेत, अशी तक्रार प्रतिभा चौधरी यांनी केली. पाणीटंचाईला मनपा प्रशासन जबाबदार असून ते वेळ काढूपणा करीत आहे. त्यांची शासनाकडे तक्रार करण्यात यावी, अशी मागणी मनोज मोरे यांनी केली. आम्हालाही समजून घ्या नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे खुलासा करताना अभियंता कैलास शिंदे म्हणाले की, तापी योजनेची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला. तो सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. एकाचवेळी सर्वच भागात पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे आम्हालाही समजून घेत सहकार्य करावे. नागरिकांना वेठीस धरू नका शहरातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक अडचणींवर मात करून गांभीर्याने पाणीप्रश्न १५ दिवसात सोडवा, असे आदेश महापौर जयश्री अहिरराव यांनी प्रशासनाला दिले. त्यांना सांगितले की, सर्व गळत्या काढून दुषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. उपायोजना करण्यासाठी प्रस्ताव तयार करा. कोणतीही जबाबदारी झटकू नये. व्हॉल्व्हमन व वॉचमन जलकुंभाच्या ठिकाणी आढळून येत नाही. त्यामुळे कामात कसुर करणार्याचा अहवाल तयार करून कारवाई करावी. पाण्यासाठी शहरातील नागरिकांना वेठीस धरता कामा नये. १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास विशेष सभा घेऊन मनपा प्रशासनावर कारवाई करण्यासाठी ठराव करून तो नगरविकास विभागाच्या सचिवांकडे पाठविण्याचा ईशाराही महापौर अहिरराव यांनी दिले. १५ दिवसात नियोजन सदस्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केल्यानंतर आयुक्त दौलतखॉ पठाण यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, प्रशासनाची रचना सदस्यांनी समजून घ्यावी. आयुक्त म्हणून जबाबदारी माझी आहे. परंतु थेट व्हॉल्व्हमनपर्यंत जाऊ शकत नाही. तसेच पाणीपुरवठा करताना तांत्रिक अडचणी येतात. विशेष म्हणजे तापी योजना ही १९८६ मध्ये कार्यान्वित झाली आहे. तेव्हापासून तीची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. तसेच शाखा अभियंत्यांनाच पाणीपुरवठ्याचा पदभार दिला आहे. त्यांनी कधीच तक्रारी केलेल्या नाहीत. खरे तर पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र ४१ पदांची आवश्यकता आहे. ती भरण्याची प्रक्रिया प्रशासनस्तरावर सुरू झाली आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता २२ जलकुंभांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत १३ जलकुंभ आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडर असतानाही भारनियमन होते. त्यामुळेही पाणीपुरवठ्याला व्यत्यय येतो. सर्व तांत्रिक बाबींवर मात करून येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. महासभा परिणामकारक ठरली.
शहराचा पाणीप्रश्न पेटला..
By admin | Updated: May 16, 2014 14:42 IST