मुक्ताईनगर : एस.टी. व बस आॅटो रिक्षाचा वळणावर समोरासमोर अपघात होऊन एक ठार, तर सहा जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खामखेडा गावाजवळील आयटीआयजवळ घडली. जखमींमध्ये एक महिला व बालिकेचा समावेश आहे. जखमी पाच जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. मयतासह सर्व जखमी कोथळी येथील असून ते लग्नकार्य आटोपून घरी परत येत होते. मुक्ताईनगर येथून जळगाव जामोदकडे जाणारी एस.टी. बस व पुरनाड फाट्याकडून मुक्ताईनगरकडे येणारी आॅटो रिक्षा (क्र. एमएच १९/एई ४८३२) या दोन वाहनांचा खामखेडा ते पुरनाड फाट्यादरम्यान शासकीय आय.टी.आय.जवळील पिरोबा दर्ग्यासमोर वळणावर अपघात झाला़ रिक्षामध्ये कोथळी येथील सपकाळ व कोळी परिवार सुलवाडी, ता.रावेर येथून लग्नकार्य आटोपून परत येत असल्याची प्राथमिक माहिती होती. या अपघातात अशोक शंकर कोळी (वय ४६, रा.कोथळी, ता.मुक्ताईनगर) हे जागीच ठार झाले. तर चिमुकली राधिका रवींद्र सपकाळे (दीड वर्ष), रवींद्र सुरेश कोळी (वय २६), कविता रवींद्र सपकाळे (वय २२), भगवान संपत कोळी (४०), गोपाळ तुकाराम सपकाळे (वय ४५, सर्व रा.कोथळी, ता.मुक्ताईनगर), कृष्णा कैलास धांडे (वय १२) रा.फोपनार, ता.बºहाणपूर हे सहा जण जखमी झाले. सहापैकी पाच जणांना जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे, तर कृष्णा धांडे यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातग्रस्तांना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गोपाळ सोनवणे, शंकर इंगळे, सरपंच ललित महाजन यांनी मदत केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
बस-रिक्षाचा अपघात, एक ठार
By admin | Updated: May 20, 2014 01:23 IST