जळगाव : प्रत्येक शहरात व शाळेत बालसाहित्य ग्रंथालय निर्माण व्हावे आणि पालकांनी आम्हा मुलांना या ग्रंथालयात पाठवावे. अभ्यासाव्यतिरिक्तची ही साहित्यविश्वाची ओळख आमच्या आचार, विचार आणि संस्कारांची अखंड शिदोरी राहील, असे प्रतिपादन रविवारी पहिल्या मराठी जिल्हा स्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात हर्षल प्रवीण पाटील (गो.से. हायस्कूल, पाचोरा) याने केले.
'कांताई' सभागृहात प्रचंड उपस्थितीत व नेटक्यारीतीने संमेलनाचे आयोजन जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था ठाणे यांनी 'कुतूहल' फाउंडेशन आणि पर्यावरण शाळेच्या सहकार्याने केले. सकाळी खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या मूळ घरापासून शानदार ग्रंथदिंडी, शोभायात्रा निघाली. प्रारंभी महापौर राखी सोनवणे व हर्षल पाटील, संपदा गायकवाड आदींच्या हस्ते पालखी पूजन झाले. राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त संशोधिका मसीराबी हनिफ पटेल (भुसावळ) हिच्यासह हर्षल पाटील, संपदा गायकवाड आणि डान्स इंडिया डान्स (डीआयडी) लिटल चॅम्पियन तनय आनंद मलारा यांच्या हस्ते दीपप्रज्वालनाने संमेलनाला प्रारंभ झाला.
■ पुढील अधिवेशन खान्देश स्तरीय असेल व ते अमळनेर येथील साने गुरुजी शाळेत होईल असे न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेच्या विश्वस्त इंदुमती पेठे यांनी जाहीर केले. काव्यवाचनात १0 बालकवींनी, सांस्कृतिक कार्यक्रमात २ समूह नृत्यात २८ बाल कलावंतांनी सहभाग घेतला. कथाकथन सत्रात २ गटात ६ बालकांनी कथा सादर केल्या.