लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असून जिल्ह्याने सक्रिय रूग्ण संख्येत देशात पहिल्या १० मध्ये स्थान पटकावले आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. बुधवारी तर बाधितांच्या संख्येने १२२३ इतका उच्चांक गाठला. गंभीर बाब म्हणजे, मृतांची संख्या १३ असून त्यात जळगाव शहरातील ६, भुसावळ तालुक्यातील २ तसेच चोपडा तालुक्यातील २, अमळनेर, धरणगाव, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी १ मृतांचा समावेश आहे. मृतांमधे २० वर्षीय महिलेचाही समावेश आहे.
दरम्यान, एकीकडे १२२३ कोरोना बाधित रूग्ण आढळून येत असताना दुसरीकडे ९०८ बाधित कोरोनावर मात करून घरी परतले आहे. ही समाधानकारक बाब आहे. जळगाव जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ८५.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना वाढत असल्यामुळे नागरिकांनी आता तरी सावध होण्याची गरज आहे.