जळगाव : राष्ट्रीय युवक दिनानिमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पातर्फे शहरातील मेहरूण व भुसावळातील कंजरवाडा परिसरात स्वामी विवेकानंद बाल संस्कार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये मुलांना शैक्षणिक अभ्यास,संस्कार,अध्यात्म या विषयावर शिकविले जाणार असून, दररोज सकाळी १० ते १२ या वेळात समतोल प्रकल्पाचे कार्यकर्ते निशुल्क वर्ग घेणार आहेत.
उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी मेहरूण परिसरातील ३० विद्यार्थी तर भुसावळ शहरातील ३५ विद्यार्थी सहभागी सहभागी झाले. समतोल प्रकल्प रेल्वे स्टेशन वर भरकटलेल्या मुलांना आधार देत आहे, तसेच या भागातील मुलांमध्ये संस्कार रुजावे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव, प्रदिप पाटील, विश्वजीत सपकाळे, योगानंद कोळी, महेद्र चौधरी, दिपक पाचपांडे, प्रशांत चौधरी उपस्थित होते.