लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जल संधारणाची कामे व ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’बाबत जनजागृतीचे संदेश देण्यासाठी आयोजित जल साक्षरता अभियान चित्ररथाचे उद्घाटन २८ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.
पाळधी येथे या रथाला हिरवा झेंडा दाखवीत रथाची सुरुवात करण्यात आली. या रथासोबत भूवैज्ञानिक विक्रांत ठाकूर यांच्यासमवेत भूजल सर्वेक्षण आणि विभाग यंत्रणा संजय खलाणे, मेघराज देसले, दीपक करणकाळ आणि तुषार देवरे या टीमचा समावेश आहे. हे अधिकारी गावागावांत जाऊन जलसंधारणाची कामे व पाणी आडवा, पाणी जिरवाबाबत जनजागृती करीत आहेत. शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत मिळणार असून, तेवढाच लोकसहभाग दिसून आला तर योजना यशस्वी होऊन संपूर्ण गावे सुजलाम् सुफलाम् होतील, असे जनजागृती करताना भू वैज्ञानिक विक्रांत ठाकूर यांनी सांगितले.