जळगाव : गुरुनानक नगरात रविवारी दुपारी तीन वाजता दुचाकीचा कट लागल्याचे निमित्त होऊन दोन गटात तुफान वाद उफाळून आले. त्यात सोनू भगवान सारवान (२५) व नीलेश नरेश हंसकर (१९) व बालण्णा लिंगण्णा गवळी सर्व रा.गुरुनानक नगर हे तीन जण जखमी झाले आहेत. दोघांवर जिल्हा रुग्णालयात तर गवळी याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनानक नगरातील गवळी व सारवान गटात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याच वादाच्या कारणावरून रविवारी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन्ही गट समोरासमोर आले. लोखंडी रॉड घेऊन आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने सोनू व नीलेश या दोघांवर हल्ला केला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. या गटानेही केलेल्या हल्ल्यात बालण्णा गवळी जखमी झाला. या वादाच्यावेळी दोन्ही गटाकडून जमाव जमला होता. पोलिसांनी तातडीने जखमींना वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने तेथे मोठा जमाव जमला होता. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक अमोल कवडे, दिनेशसिंग पाटील, मुकुंद गंगावणे, कांबळे यांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. उशिरापर्यंत घटनेचे मूळ कारण स्पष्ट झालेले नव्हते. सोनू व नीलेश जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने कारण गुलदस्त्याच राहिले. दरम्यान, सोनू हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.