लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मार्चच्या तुलनेत एप्रिलची सुरुवात काहीशी दिलासादायक झाली आहे. या आठवडाभरात जेवढे रुग्ण आढळले आहेत, तेवढेच रुग्ण बरे झाले आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्या वाढल्यानंतरही बाधितांचे प्रमाण स्थिर असल्याने जास्तीत जास्त रुग्ण लवकर विलग होत असल्याने संसर्गाची साखळी काहीशी खंडित होत असल्याचे चित्र आहे.
दुसऱ्या लाटेची सुरूवात सौम्य लक्षणांनी झाली मात्र, रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात आता ऑक्सिजन पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्याही १३९४, वर पोहोचली आहे. दुसरीकडे रुग्ण तातडीने विलग होत असल्यामुळे पुढील संसर्गाचा धोका टाळण्यात यश येत आहे. चाचण्यांची संख्या स्थीर राहिल्यास लवकरच कोरोनाची ही साखळी खंडित करता येईल, असाही अंदाज बांधला जात आहे. एप्रिलमध्ये एका दिवसात १२२४ रुग्ण बरे होण्याचा उच्चांक नोंदविण्यात आला होता.
बाधितांचे प्रमाण कमी
मार्चमध्ये बाधितांचे प्रमाण हे १६ टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे प्रमाण १३ टक्के नोंदविण्यात आले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ६२१५९ चाचण्या झाल्या असून, यात ८०८१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे शहरात बाधितांचे प्रमाण हे ४० टक्क्यांवरून २५ टक्यांवर पोहोचले आहे. चाचण्या वाढल्या असल्या तरी संख्या स्थिर असणे हे चांगले संकेत असल्याचेही बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत कोरोनाचा डॉऊन फाॅल सुरू होईल, असेही काही तज्ज्ञ म्हणत आहेत. मात्र, यात नागरिकांचीच भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे. वैयक्तिक काळजी घेऊन स्वत:ला जेवढे सुरक्षित ठेवला तेवढेच दुसरे सुरक्षित राहतील, असेही डॉक्टर सांगतात.
एप्रिलमधील स्थिती अशी
८०८१ बाधित
८०८१ रुग्ण बरे झाले
६२,१५९ चाचण्या