जळगाव : यंदाच्या अर्थ संकल्पात रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटींची तरतूद केली असली तरी, भुसावळ विभागासाठी रोजगाराभिमुख कुठल्याही नवीन प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच भुसावळ विभागातून मुंबई, दिल्ली, बंगळूर या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्याही नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा न केल्यामुळे प्रवाशी वर्गातून काहीसी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भुसावळ विभागात रखडलेल्या रेल नील व मेमू शेडचा प्रकल्प सुरू करण्याबाबतही कुठलीही घोषणा न करण्यात आल्यामुळे भुसावळच्या वाट्याला यंदा कुठलीच मदत मिळाल्या नसल्याचा भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. मात्र, रेल्वेसाठी तरतूद करण्यात आलेल्या १ लाख १० हजार कोंटीच्या तरतूदीतून इतर कामे मार्गी लागणार असल्याचा विश्वास प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कासार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भुसावळ विभागाचे डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनीदेखील यंदा भुसावळ विभागासाठी नवीन प्रकल्प व नवीन गाड्यांची घोषणा करण्यात आलेली नसली तरी, विकासकामे करण्यासाठी ६०० कोटींच्या घरात रक्कम मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.