लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजने जळगाव औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र चालविण्याबाबत एमआयडीसी कार्यालयाला नोटीस दिली होती. त्यात म्हटले होते की, २००३च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे केंद्र एमआयडीसीला सुरू करायचे आहे. मात्र, अद्यापही हे केंद्र सुरू न झाल्याने उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका का दाखल करु नये, अशी विचारणादेखील असोसिएशनने केली होती. त्यानंतर हे केंद्र सुरू करण्यासंदर्भात हालचाली करण्यात आल्या आहेत.
दी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजने दिलेल्या पत्रात म्हटले की, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार, या क्षेत्राची रचना करणे आणि विकास करणे तसेच व्यवस्था पाहणे हे महामंडळाचे काम आहे. मात्र, कालांतराने महामंडळाने पाणी पुरवठा वगळता सर्व बाबी महापालिकेकडे सुपूर्द केल्या. त्यावर २००३मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. त्यानुसार महामंडळाने सर्व व्यवस्था ताब्यात घेतली. मात्र, अग्निशमन केंद्र अजूनही बंद आहे. या काळात काहीवेळा उद्योगांमध्ये आगी लागण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. अग्निशमन केंद्रे या भागापासून बरीच लांब आहेत. मात्र, हे अग्निशमन केंद्र महापालिकेच्या ताब्यात आहे. ते परत मिळाले तर चालविण्यासंदर्भात विचार करू, असे उत्तर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत असल्याची याचिका दाखल करण्याचा इशारा अध्यक्ष श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिला होता.
पत्रानंतर काय घडले ?
या पत्रानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली असून, महिनाभरात हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी लवकरच इस्टिमेटदेखील तयार केले जाणार असल्याची माहिती श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिली.