रावेर : जळगाव व बुलडाणा जिल्ह्यांतील मेंढ्यांना गायरान व वनक्षेत्रात वनचराईसाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली असताना चुनाबर्डी वनक्षेत्रालगत वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ व्यावसायिकांना वनचराईसाठी व लालमाती तथा पानथा धरण क्षेत्रातील पाणवठ्यावर पाणी पाजण्यास मनाई करण्यात आल्याने १० मेंढ्या दगावल्या असल्याने प्रायोगिक तत्त्वावरील अध्यादेश अमलात आणण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून खानापूर महसूल भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील यांना देण्यात आले.
शासनाच्या प्रायोगिक तत्त्वावरील अध्यादेशानुसार शासकीय गायरान वा वनक्षेत्रात पारंपरिक मेंढपाळ व्यावसायिकांना मेंढ्यांना वनचराईसाठी व पाणी पाजण्यासाठी अनुमती न दिल्यास राज्यभर मेंढपाळ व्यावसायिकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल व होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीतर्फे देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समितीचे सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, रावेर पिंपल्स बँक चेअरमन ॲड. प्रवीण पासपोहे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिलाल सोनवणे, शहराध्यक्ष शुभम नमायते, नीलेश सावळे, देवलाल बावस्कर आदी धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
धनगर समाज संघर्ष समितीतर्फे अव्वल कारकून विठोबा पाटील यांना निवेदन देताना सुरेश धनके, संदीप सावळे, ॲड. प्रवीण पासपोहे, हिलाल सोनवणे, शुभम नमायते आदींसह कार्यकर्ते.