लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचातय निवडणुकींच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होऊन जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतीची निवड बिनविरोध झाली आहे. यात अमळनेर मधील सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, एकूण किती उमेदवारांनी माघारी घेतली आणि किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, याची एकत्रीत आकडेमोड रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
जिल्हाभरातील ७८३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यात ३१ रोजी अर्जांची छाननी होऊन १९ हजार ९८३ अर्ज वैध ठरले होते. २ हजार ६७० प्रभागांमध्ये ७ हजार २१३ सदस्य निवडून द्यायचे होते. त्यात सोमवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती. सोमवारीच उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात रात्री उशीरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सात तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. उर्वरित ८ तालुक्यांची आकडेमोड रात्री उशीरापर्यत सुरू होती. दरम्यान, ९२ ग्रामपंचयतींची निवड बिनविरोध झाल्यानंतर तसेच नशिराबाद ग्रामपंचायत निवडणुकीतून सर्व ८२ उमेदवारांनी एकत्रीत माघार घेतली आहे. यामुळे ९३ ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले असून आता उर्वरित ६९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.
तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायती
जळगाव - २, जामनेर -३, एरंडोल-८, धरणगाव - ९, भुसावळ - २, यावल -१, रावेर - ०, मुक्ताईनगर - ४, बोदवड - २, अमळनेर - १५, पारोळा - १२, चोपडा - १०, पाचोरा - ११, भडगाव - ४, चाळीसगाव -९