जालना : दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईतून होरपळून निघालेल्या जालनेकरांसह पालिका प्रशासनालाही पाण्याची अजूनही किंंमत कळली नाही, असे दुर्दैवी चित्र समारे आले आहे. शहरातील विविध भागात पाणी सोडण्यात येते. परंतु ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्यामुळे नेहमीच लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ विशेषत: शहरातील देहेडकरवाडी, लक्कडकोट, कचेरी रोड, शास्त्री मोहल्ला यासह इतर भागात पाणीपुरवठा झाल्यानंतर फुटलेल्या जलवाहिन्यांतून पाण्याचे पाट वाहू लागतात. त्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे.दरम्यान, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे परिसरातील जलसाठ्यात मुबलक पाणी आहे. त्यामुळे यावर्षी जालनेकरांना फारशी पाणीटंचाई भासली नाही. म्हणूनच की काय पाण्याचा बेसुमार अपव्यय होत आहे. नळांना पाणी आल्यानंतर तासन्तास उघड्या नळांमधून पाणी रस्त्यावर वाहत आहे. अनेक ठिकाणी चक्क वाहन, व्हरंडे, गच्ची धुतली जात आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळून निघालेल्या जालनेकरांना पाण्याचे आजही महत्व कळाले नाही, असेच म्हणावे लागेल. दुसरीकडे गळत्यांची दुरुस्ती करणे, तोट्या बसविण्याचे साधे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले नाही. जायकवाडीहून जालन्यापर्यंत पाणी आणण्यासाठी तब्बल ८४ किलोमीटरचे अंतर कापावे लागते आहे़ त्यासाठी दोन ठिकाणी ३०० अश्वशक्तीचे प्रत्येकी सहा पंप बसविण्यात आले आहेत़ त्यासाठी विजेचा खर्च तब्बल ३२ लाख रूपये महिन्याकाठी खर्ची करावे लागतात़ शिवाय जलशुद्धीकरणासह देखभाल दुरूस्तीचा खर्च १५ लाखाच्या वर आहे़ शिवाय मनुष्यबळावरील खर्च वेगळा. एवढा खर्च होऊनही शहरातील अनेक भागांमधून पाण्याची गळती सुरूच आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याचा अतिशय कमी वापर आणि नियोजन करण्याची गरज असतांना बेफिकीर जालनेकर अन् निष्काळजी प्रशासनामुळे ने मोठ्या प्रमाणात उदासिनता दाखविली जात आहे. त्यासाठी नगरसेवक, विभागप्रमुख आणि पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष यांनी नियोजन करून गळती काढण्याचे काम हाती घेतल्यास वाया जाणारे वाचविता येईल़ विविध ठिकाणी खाजगी किंवा सार्वजनिक नळ उघडेच आहेत. नागरिकांसह सामाजिक संघटनांनीही पाणी वाचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. नगरसेवकांनीही आप-आपल्या वॉर्डातील उघडे नळ बंद करावेत, नागरिकांनाही तसे आवाहन केल्यास पाण्याचा अपव्यय निश्चित कमी होईल, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)गळती कधी थांबविणार...संपूर्ण शहरात विविध भागात पाणीपुरवठा होत असताना सडलेल्या जलवाहिन्या व नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे पाण्याचे पाट वाहतात. परंतु त्यांचे सोयरसुतक पालिकेच्या बहुतांश सदस्यांसह प्रशासनास नाही, असे दुर्दैवी चित्र समोर आले आहे़ सततच्या पाणीगळतीमुळे त्या-त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. पाणीपुरवठ्यानंतर या खड्ड्यांमधून पाणी साचते. खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. पालिकेने किमान हे खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे. नागरिकही बेफि कीरसंपूर्ण उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या, विकतच्या पाण्यावरच तहान भागविणाऱ्या नागरिकांना अद्यापही पाण्याचे महत्व कळले नाही़ नळांना तोट्या बसविल्या नाहीत़ पाणी भरल्यानंतर पाणी वाया जाते आहे़नगरसेवकांचीही जबाबदारीउन्हाळ्यात स्वत:च्या खर्चातून आपल्या प्रभागात अनेक नगरसेवकांनी पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागविली. तसेच प्रभागातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी वेळप्रसंगी भांडणाऱ्या नगरसेवकांनीही स्वत:च्या प्रभागातील पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.
पाण्याची किंमत कधी कळणार?
By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST