आंबा : जीव, शिव आणि संत यांचे जगात येण्याचे ठिकाण जरी एक असले तरी, प्रयोजन मात्र वेगवेगळे आहे. जीव आणि शिव यांच्या कार्यापेक्षा संताचे कार्य वेगळे आहे. जीवाला शिवापर्यंत पोहचण्याचे नव्हे तर जीवाचा शिव आणि शिवाची मुक्तता करण्याचे काम संत करत असतात. संत सहसा ओळखले जात नाहीत. संतांना ओळखण्यासाठी वेगळी दृष्टी, वेगळा दृष्टीकोन अंगीकृत करावा लागतो. संत झाल्याशिवाय किंवा संतांच्या विचारांचे आचरण केल्याशिवाय संत ओळखता येत नाहीत, अनुभवता येत नाहीत, असे प्रतिपादन ह.भ.प. कृष्णा महाराज शिंदे शहापूरकर यांनी केले.
दैठणा येथील गंगाभारती संस्थानच्या हरीनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. अध्यात्म आणि धार्मिकता यातील फरक स्पष्ट करताना शिंदे महाराज म्हणाले, अध्यात्माला कोणत्याही धर्माची चौकट नसते. अध्यात्मात केवळ भाव महत्वाचा समजला जातो. अध्यात्म वाढत केला की, समाजात नेकी, बंधूभाव आणि परस्पर प्रेम वाढते.
धार्मिकता मग ती कोणत्याही धर्माची असो, कट्टरतेच्या दिशेने वाढली तर ती विकासाला मारक आणि विनाशाला पूरक ठरत असते. धर्माचे खरे सार बाजूला राहून धार्मिक कट्टरता वाढल्याने धर्म-धर्मामध्ये होणाऱ्या संघर्षामध्ये वाढ होऊ लागली आहे. याबाबत प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
जीवनात परमार्थ आणि प्रपंच या दोन भिन्न बाबींमध्ये समन्वय साधून जीवन मुक्तीचा मार्ग दाखविण्याचे कार्य संत करत असतात. संताच्या या कार्यामुळेच ते जीव आणि शिव यांच्यापेक्षा वेगळे ठरतात. अनेक दृष्टातांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कीर्तनरुपी विचार उपस्थितांना पटवून दिले.
यावेळी भाविकांची उपस्थिती होती.
फोटो