जालना : राज्यात ग्रामीण भागातील शाळाबाह्य विद्यार्थिनींसाठी शासनाने सुरू केलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संतोष राजगुरू यांनी केले. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी जालना येथे मेळावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना राजगुरू बोलत होते.
१२ ते १३ वर्षांपासून कस्तुरबा गांधी विद्यालयांमध्ये सेवा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक
मूलभूत प्रश्न आहेत. त्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी आर काळे, प्रहार लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन धांडगे, मुकुंद खरात, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय संघटनेचे अध्यक्ष लहाने, एन. डी. बोरडे आदींची उपस्थिती होती. सर्व प्रश्न लवकरच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्यमंत्री बच्चू कडू व संबंधित मंत्रालयीन अधिकारी यांच्याकडे मांडणार असल्याचेही राजगुरू यावेळी म्हणाले.
फोटेा