आन्वा : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान उशिराने प्राप्त झाले आहे. परंतु, शेतकऱ्यांची खाती महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असताना हे अनुदान जिल्हा बँकेतच्या यादीत आले आहे. त्यामुळे अनुदान उचलण्यासाठी शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
वाकडी येथील अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या भोकरदन शाखेत आहेत. परंतु, भोकरदन तहसील कार्यालयाने ज्या बँकेत लाभार्थी शेतकऱ्यांचे खाते नाही त्या बँकेत दुष्काळी अनुदानाची यादी दिली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, रोगराईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रशासकीय गोंधळामुळे जिल्हा बँकेत चकरा माराव्या लागत आहेत. आन्वा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नवीन खाते उघडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, खाते उघडण्यासाठीही पैसे मोजावे लागत आहेत. त्यात येणारा इतर खर्च हा वेगळाच आहे. तसेच आन्वा गावाला जाण्यासाठी बस नाही. तसेच मध्यवर्ती बँकेत नवीन खाते उघडले की खात्यावर पाचशे रुपये ठेवावे लागतात. जर आज मध्यवर्ती बँकेत खाते खोलले तर कमीत कमी शेतकऱ्यांचे नगदी आठशे रुपये जातात. मध्यवर्ती बँकेत पैसे नसले की पुन्हा बँकेत पैशांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे हे अनुदान महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत वर्ग करावेत, अशी मागणी वाकडी येथील पोलीस पाटील महादू सिरसाठ, राजू सिरसाठ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.