जालना : धनलाभ करून देणे, पुत्रप्राप्तीसह इतर विविध आमिषे दाखवून नागरिकांना अंधश्रद्धेच्या आहारी घेत हातचलाखीच्या माध्यमातून करणी-भानामती करणाऱ्या भोंदू बाबांची चलती आहे.
नागरिकांच्या अज्ञानाचा लाभ घेत मानसिक, आर्थिक लूट केली जाते. अशा भोंदू बाबांच्या कृत्याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. नागरिकांनीही या अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूंच्या हातचलाखीला बळी न पडणे गरजेचे आहे.
२०१३ मध्ये झाला कायदा
जादूटोणा, करणी, भानामती आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी २०१३ मध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ लागू करण्यात आला आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
भानामती कसली,
हे तर खेळ विज्ञानाचे
म्हणे, पैशांचा पाऊस पाडतो..
पैशांचा पाऊस पाडतो म्हणून अनेकांना लुटले जाते. जालना जिल्ह्यातील एका व्यक्तीला अशा प्रकरणात अटकही झाली आहे.
अनेकांकडून अघोरी कृत्य
धन मिळविणे, भूत-पिशाच्चांना घालविण्याचे आश्वासन देत अनेकजण अघोरी कृत्य करतात. यातील अनेक कृत्ये ही विज्ञानाचा आधार घेत हातचलाखीने केली जातात.
कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी
जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्यासाठी पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना १८ वर्षे संघर्ष करावा लागला. त्यांचा खून झाल्यानंतर कायदा संमत झाला. शासनाने या कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
-ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा कार्याध्यक्ष
अलौकिक शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून संतान प्राप्तीसाठी महिलांचे शोषण केल्याचे प्रकार समोर आले.
होमहवन करून अमानुष कृत्येही करण्यास सांगितली जातात. यापासून नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.