जालना : कंत्राट संपल्यानंतर कामावरून कमी करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतच्या १०५ कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, याबाबतच्या सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावात रुग्णसंख्या वाढल्याने शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड रुग्णालयासाठी १०५ कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात आली होती. कंत्राट संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्याचे संदेश मोबाईलवर पाठविण्यात आले. उपासमारीची कुऱ्हाड कोसळलेल्या या कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य विभागातील रिक्तपदांवर नियुक्ती मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन समस्या मांडण्यात आल्या होत्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावरच पालकमंत्री टोपे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी सूचना दिली होती. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
चौकट
पालकमंत्री सकारात्मक
आमच्या शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन आमच्या समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती शिष्टमंडळातील शरद चव्हाण, अॅलेक जेकब, सतीश बुट्टे, मारिया कांबळे, सौरभ तांबे यांनी दिली.
फोटो