शेषराव वायाळ
परतूर : तालुक्यातील रब्बीची पिके बहारात असतानाच महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी तब्बल ६५० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. महावितरणकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे हातातोंडाशी आलेली रब्बीतील पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली होती. रब्बी हंगामातही रोगराईसह इतर संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी पिके जगविली आहेत. रब्बीतील गहू, हरभऱ्यासह इतर पिके सध्या बहारात आहेत. या पिकांमुळे चांगले उत्पन्न हाती मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु, महावितरण कंपनीने अचानक थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील तब्बल ६५० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रोहित्रांवरील कृषी पंप धारक शेतकरी ग्राहकांची संख्या ७ हजारावर आहे. या शेतकऱ्यांकडे जवळपास ४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, गहू, हरभरा, ज्वारी, उसासह इतर पिकांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु, वीज पुरवठा खंडित झाल्याने या पिकांना पाणी देता येत नाही. अगोदरच शेतकरी अस्मानी संकटांनी हैराण झालेले आहेत. त्यात आता महावितरण कंपनीकडून कारवाईचा शॉक दिला जात आहे. या कारवाईमुळे आणि उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून ही पिके जगविली आहेत. परंतु, महावितरणच्या या कारवाईमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत असून, वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
कोट
थकीत वीज बिल वसूल होणे गरजेचे आहे. त्यामुळे नाइलाजाने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहेे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेनुसार ५० टक्के वीज बिल भरले तर त्यांचे उर्वरित बिल कृषी धोरणांतर्गत माफ होणार आहे.
एन. व्ही. बेंडळे, उपविभागीय अभियंता, परतूर