परतूर : तालुक्यातील आंबा ग्रामपंचायतीतील सरपंच निवडीपूर्वीच राजकीय हलचालींना वेग आला आहे. बहुमताच्या पॅनलमधील तीन सदस्य अल्पमतातील पॅनलला मिळाले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीत भाजपाचा पुन्हा वरचष्मा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
परतूर तालुक्यातील सातोना (खु.) वाटूर व आंबा या ग्रामपंचायती सर्वात मोठ्या आहेत. यापैकी आंबा ही मागील कार्यकाळात भाजपाच्या ताब्यात होती. मात्र या पाच वर्षाच्या काळात सदस्यात मतभेद होऊन भाजपातच उभे दोन गट पडले. यामध्ये उपसभापती नामदेव काळदाते व मेहरात खतीब यांचा एक गट व सध्या ग्रामपंंचायत ताब्यात असलेले प्रशांत बोनगे यांचा एक गट तयार झाला. दोन्ही गट या निवडणुकीत उतरले होते. यामध्ये नामदेव काळदाते व मेहराज खतीब यांच्या गटाला ११ पैकी ६ जागा मिळून बहुमत प्राप्त झाले. तर प्रशांत बोनगे यांच्या गटाला ५ उमेदवार विजयी झाले होते. यातील काही सदस्य सहलीवरही गेले असतानाच सरपंच व उपसरपंच पदावरून रस्सी खेच होऊन काळदाते व खतीब यांच्या बहुमत असलेल्या गटाचे तीन सदस्य प्रशांत बोनगे यांच्या गटाला मिळाल्याने या ग्रामपंचायतीचे चित्र बदलणार असल्याची चिन्हे आहेत.
चौकट.
ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गाला
ही ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गाला सुटली आहे. आता महिला की पुरूष हे ५ फेब्रुवारीच्या आरक्षण सोडतीनंतर समोर येणार आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.