जालना : जालना जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुका सुरळीत व शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी १२६ अधिकारी, १,१५० पोलीस कर्मचारी, एक हजार होमगार्ड व दोन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्या होत्या. त्यामुळे शासनाने ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात. त्यामुळे निवडणुका शांतेतत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांसह १२६ अधिकारी, १,१५० पोलीस कर्मचारी व १,००० होमगार्ड व दोन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.