मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी
बदनापूर : शहरातील बाजारपेठेसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने, चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे, शिवाय पादचाऱ्यांनाही मोकाट जनावरांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
विस्कळीत सेवेमुळे मंठा शहरवासीय त्रस्त
मंठा : शहरासह परिसरातील बीएसएनएलसह खासगी कंपन्यांचीही सेवा विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे एकमेकांना संपर्क साधताना अडचणी येत असून, इंटरनेट सेवेचाही पूर्णत: बोजवारा उडाला आहे. इंटरनेटअभावी बँकिंगसह शासकीय, निमशासकीय कामावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी केली जात आहे.
ग्रामीण रुग्णालयात युनानी दिन साजरा
भोकरदन : शहरातील ग्रामीण रुग्णालयात जामिया मिलिया इस्लामियाचे पहिले कुलगुरू हकमी आजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जागतिक युनानी दिन साजरा करण्यात आला. यावेळी युनानी तज्ज्ञ डॉ.शाहीद देशमुख यांनी युनानी औषधी, उपचार पद्धतीबाबत माहिती दिली. कार्यक्रमास अधीक्षक डॉ.दयानंद मोतीपवळे, डॉ.अमोल मुळे, डॉ.हर्षल महाजन, डॉ.दीपक सोनी, डॉ.सय्यद वसीम, त्र्यंबक सुरासे, बबलू पठाण आदींची उपस्थिती होती.
शिक्षक संघाचे प्रश्न सोडविण्याची मागणी
मंठा : महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या मंठा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांची भेट घेऊन शिक्षकांचे विविध प्रश्न मांडले. शिक्षकांच्या प्रश्नावरील चर्चेनंतर हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सवडे यांनी दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, भगवान जायभाये, सुनील साबळे, कृष्णा सवडे, अहीरराव यांच्यासह शिक्षक संघटने पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.
खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ
अंबड : शहराला जोडणाऱ्या विविध ग्रामीण रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असून, शेतकरी, प्रवाशांना अशा खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत आहे. वाहन चालकांनाही कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. ग्रामीण रस्त्यांची दुरस्ती करण्याची मागणी वेळोवेळी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.