ट्रॅव्हल्स चालकाचा प्रताप; पोलीस तपासात उघड
जालना : गुजरात राज्यातील सुरत येथील परिवहन महामंडळाच्या बसचा नंबर वापरून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक केल्याचा प्रताप ट्रॅव्हल्स चालकांकडून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. यावरून ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी समोर आली आहे.
११ फेब्रुवारी २०२० रोजी लक्झरी बस चालकाने भरधाव वगाने बस चालवून टँकरला धडक दिल्याची घटना औरंगाबाद - जालना महामार्गावरील सेलगाव येथील उडाणपुलावर घडली होती. यात अनेकजण गंभीर जखमी झाले होते. अपघात घडताच बसचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी योगेश शंकरराव खानंदे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांना कुठलीही माहिती मिळत नव्हती. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी हा तपास वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांच्याकडे दिला. पोनि. पवार यांनी सदरील गाडीचा नंबर तपासला. या नंबरबद्दल त्यांनी आरटीओ कार्यालयाकडून अधिक माहिती घेतली असता, त्यांना सदरील गाडी ही गुजरात राज्यातील सुरतमध्ये असल्याचे समजले. त्यांनी पथकासह सुरत गाठले. तेथील परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता, त्यांनी सदरील क्रमांकाची बस आमची असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता, सदरील ट्रॅव्हल्स चालक गुजरात येथील परिवहन महामंडळाच्या गाडीचा नंबर वापरून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करीत असल्याचे समजले. त्यांनी याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांना दिली. पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सदरील प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
ट्रॅव्हल्स चालकांचा मनमानी कारभार
सदरील ट्रॅव्हल्स ही अमरावती येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक साहित्य ट्रॅव्हल्समध्ये ठेवले जात आहे. याकडे आरटीओ विभागाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. काही ट्रॅव्हल्सचालक टॅक्स वाचविण्यासाठीसुध्दा नंबर प्लेट बदलत असल्याचे दिसून आले.
बदनापूर येथे एका ट्रॅव्हल्सने टँकरला धडक दिली होती. या अपघाताला वर्ष उलटले आहे. ट्रॅव्हल्सचालक फरार झाला होता. आम्ही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅव्हल्सचा नंबर बदलल्याचे समजले. आम्ही पुढील कारवाई करू.
पवार, पोलीस निरीक्षक
ट्रॅव्हल्सच्या अपघातात अनेकजण गंभीर जखमी होतात. त्यांना नुकसान भरपाई म्हणून ट्रॅव्हल्स कंपनीकडून पैसे दिले जातात. परंतु, हे ट्रॅव्हल्स चालक ट्रॅव्हल्सचा नंबरच बदलतात. अपघात झाला की, ते फरार होतात.