शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा
पारध: भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. सध्या हे पीक चांगले बहरले असून, शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील मिरची, मका, कापूस व सोयाबीन ही पिके हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले होते. असे असले तरी पारधसह वालसावंगी, धावडा, विझोरा, आन्वा, पिंपळगाव रेणुकाई, शेलूद, पद्मावती, मासरूळ आदी भागांत मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील पद्मावती धरण शंभर टक्के भरले. शेतक-यांनी खचून न जाता रब्बी हंगामात पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांची लागवड केली. पारध आणि परिसरातील पारध खुर्द, पिंपळगाव रेणुकाई, शेलूद, वालसावंगी, पद्मावती, लेहा आदी ठिकाणच्या शेतक-यांनी खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कांदा पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक चांगले बहरले असून, शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना कांद्याला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.
यावर्षी सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरींना मुबलक पाणी आहे. आम्ही या पाण्याचे योग्य नियोजन करून कांदा लागवड केली. सध्या कांदा चांगला बहरलेला आहे. आम्हाला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा आहे.
रवी दिगंबर लोखंडे, शेतकरी, पारध बु.
फोटो ओळी
भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात कांद्याचे पीक असे बहरले आहे.