अंबड : प्रत्येक खेळामध्ये शिस्त हा प्रगतीचा पाया असून कबड्डी हा खेळ मन व शरीराला मजबूत करणारा क्रीडाप्रकार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे यांनी केले.
अंबड शहरातील दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. खेळाडूंनी खेळ हा खिलाडू वृत्तीने खेळणे गरजेचे आहे. गैरप्रकारामुळे अनेक पुरस्कारप्राप्त खेळाडू कारवाईला सामोरे गेले आहेत. त्यामुळे खेळाडूंनी शिस्त पाळणे गरजेचे असल्याचेही पांडे म्हणाले. या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये जाफराबाद येथील जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाने प्रथम, वाटूर येथील विहान क्रीडा मंडळाने द्वितीय, यावल पिंपरी येथील केसुला क्रीडा मंडळाने तृतीय रामनगर येथील वसंतराव नाईक क्रीडा मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला. समारोपप्रसंगी तहसीलदार विद्याचरण कडवकर, बप्पासाहेब गोल्डे, नगरसेवक गंगाधर वराडे, श्रीकांत जायभाये, माधवराव कोरडे, सुनील चव्हाण, राजेश जाधव, नामदेव पवार, द्वारकादास जाधव, डॉ. भोसले, लहाने, कल्याण राठोड, प्रा.भुजंग डावकर, डॉ.अभय जाधव, प्रेमदास राठोड, रमेश यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. प्रास्ताविक संजय येळवंते, सूत्रसंचालन डॉ. मारुती घुगे यांनी तर प्रेमदास राठोड यांनी आभार मानले.