यंदा लग्नसराईमध्ये कपडा, भांडे, किराणा, इलेक्ट्राॅनिक, सोने, चांदी आदींची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. कॅटरिंग व्यावसायिकांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बाजारात उत्साह दिसून येत आहे.
तुरीच्या दरांत मागील आठवड्यापासून तेजी सुरू झाली आहे. राज्यात तुरीची आवक चांगली आहे. जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज आठ हजार पोते इतकी असून शंभर रुपयांची तेजी आल्यानंतर भाव ५२०० ते ५८५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
सोयाबीनची आवक दररोज एक हजार पोते इतकी असून शंभर रुपयांची तेजी आल्यानंतर भाव ४२५० ते ४३५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सोयाबीनचे दर भविष्यात तेजीतच राहतील, असा अंदाज आहे.
सरकारने आयात तेलाची टेरिफ व्हॅल्यू वाढवल्यामुळे सर्व प्रकारचे खाद्यतेल क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांनी महागले आहेत. तेलावर सटोरियांची पकडही मजबूत आहे. त्यामुळेच तेलाचे दर मागील दोन महिन्यांपासून वाढतच आहेत. सोयाबीन तेल १२५००, सरकी तेल १२०००, पामतेल ११६००, शेंगदाणा तेल १४००, करडी तेल १६००० आणि सूर्यफूल तेलाचे दर १३६०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
गुळाची आवक दररोज ४ हजार भेली इतकी असून भाव २४५० ते ३२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साखरेचे दर ३३०० ते ३४५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
संक्रांतीनिमित्त तिळाला मोठी मागणी असून भाव १५० ते २०० रुपये प्रतिकिलो असे आहेत. जालन्यातील घेवर फेणी राज्याच्या बाहेरदेखील प्रसिद्ध आहे. बडी सडक भागात घेवर फेणीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. घेवर तसेच फेणीचे भाव ३०० ते ६०० रुपये प्रति किलो असे आहेत.
गहू, ज्वारी, मका आदी धान्यांपासून इथेनाॅल बनविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे धान्य महागणार आहे. इथेनाॅलचा उपयोग पेट्रोलियम पदार्थ बनविण्यासाठी होईल तसेच डिटर्जंट पावडर, पेंट्स, परफ्यूम आदी उद्योगांमध्येही इथेनाॅल वापरता येईल. मात्र, यामुळे धान्य महागणार आहे.
गव्हाची आवक दररोज ५०० पोते इतकी असून भाव १६०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ४०० पोते इतकी असून भाव १४०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. बाजरीची आवक दररोज ३०० पोते इतकी असून भाव ११०० ते १५५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. मक्याची आवक दररोज ५०० पोते इतकी असून भाव ११०० ते १३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
हरभरा डाळीचे दर ५००० ते ५६००, तूर डाळ ८१०० ते ९५००, मूग डाळ ८००० ते ९५००, मसूर डाळ ६००० ते ७००० आणि उडद डाळीचे दर ७५०० ते १०००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
शेंगदाणा ८००० ते १००००, साबुदाणा ४१०० ते ४८००, पोहे ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. नारळ ९५० ते ११०० रुपये प्रति ६० नग असे दर आहेत.