रांजणी ते विरेगाव मार्गाची दुरवस्था झाल्याने शेतकरी, नागरिकांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. या मार्गावरून जवळपास ४० गावांतील नागरिकांना प्रवास करावा लागतो. खराब रस्त्यामुळे अनेकांनी या मार्गावरून प्रवास करणेच बंद केले आहे. शिवाय, रस्ता अपघातातही वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करावे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू केले आहे. परंतु, होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब लक्षात येताच सरपंच अमोल देशमुख, उपसरपंच रहीम शेख यांनी शनिवारी दुपारी हे काम बंद पाडले.
रस्ताकाम बंद पाडल्याचे समजताच अभियंता ठोंबरे यांनी कामाला भेट देवून हे काम चांगल्या दर्जाचे करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे काम सुरू करण्यात आले. यावेळी सरपंच देशमुख, उपसरपंच शेख, जगन्नाथ काकडे, गजानन सोसे, मोईन बेग, सिकंदर शेख आदींची उपस्थिती होती.
सूचनांकडे दुर्लक्ष
रांजणी- विरेगाव या रस्त्याच्या कामाबाबत माजी पंचायत समिती सभापती नाना उगले, भगवान तांगडे व इतरांनीही नाराजी व्यक्त करीत चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, संबंधित गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष केले. रस्ता खराब होत असल्याने शनिवारी काम बंद पाडण्यात आले. ग्रामस्थ आक्रमक होताच संबंधितांनी या रस्त्याचे काम चांगल्या पध्दतीने करण्यास सुरुवात केले आहे.
फोटो