परतूर : बापाचं मुलीवर नितांत प्रेम असते. ज्या बापाला मुलगी आहे, तो बाप फार आनंदी असतो, असे प्रतिपादन हभप अक्रूर महाराज साखरे यांनी केले.
तालुक्यातील येणोरा येथील अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. संत नामदेव महाराज यांच्या 'कामामध्ये काम, काही म्हणा राम राम' या अंभगावर साखरे महाराज निरूपण देत होते. ज्या बापाला मुलगी नाही, तो अभागी आहे. संत जनाबाईला तिचा बाप घरी नेण्यास आला. मात्र, ती ऐकत नव्हती. जगातला कोणताच बाप आपल्या मुलीला मंदिरात सोडू शकत नाही. मात्र, जनाबाईच्या बापाचा नाईलाज झाला. जनाबाई जात्यावर दळण दळायची अन् म्हणायची तू ये रे बा विठ्ठला. 'दळीता कांडीता तुज गाईन अनंता.' प्रत्येक काम करताना जनाबाईच्या मुखी एकच काम विठ्ठल होते. विठ्ठलनामापुढे जनाबाई सर्व जग विसरली होती. देव दळू लागायचे जनाबाईला. देव जनाबाईला सर्व काम करू लागत असे. कारण, भक्तीत तेवढी ताकद होती. संत नामदेवांनी देवाला त्यांचे पाय मागितले. कारण जगातले सुख एका बाजूला होते आणि देवाच्या पायाचे सुख एका बाजूला होते. देवाच्या पायात फार मोठी ताकद आहे. तुमचे पाप धुण्याची ताकद गंगेत आहे. कान्होपात्राने देवाच्या पायावर जीव दिला. तिला मंदिरात जागा मिळाली. असे सांगून शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, धारातीर्थी पडलेले मावळे यांचे शौर्य तरुणांपुढे आपल्या कीर्तनातून उभे करून तरुणांना स्फूर्ती देण्याचे काम हभप अक्रूर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून केले.
यावेळी हभप प्रसिध्द गायक हभप पंढरीनाथ कदम, हभप निवृत्ती महाराज लकडे, मृदंगाचार्य नरहरी महाराज निचळ, हभप गणेश महाराज जाधव, नितीन जोगंदड, भारत भुंबर, हभप उत्तमराव भोसले, किसनराव वायाळ, परमेश्वर जोगदंड, शिवाजी जोगदंड, सुरेश भुंबर, प्रकाश बोंबलेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.