राजूर : गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेण्याचा मोह टाळावा, असे आवाहन क्षेत्रीय सहायक ज्ञानेश्वर डासाळ यांनी केले.
जागतिक निसर्ग निधी व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने तपोवन (ता. भोकरदन) येथे गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात आणण्यासाठी जनजागृतपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करताना डासाळ बोलत होते. येणाऱ्या हंगामात कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी सध्या शेतात उभे असलेले कपाशीचे पीक उपटून फेकण्याचे आवाहन त्यांनी केले. फरदड पिकांतून शेतकऱ्यांना काही प्रमाणात उत्पन्न होऊ शकते; परंतु आगामी हंगामात बोंडअळीने शिरकाव केल्यास उत्पादनात प्रचंड घट होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून येणाऱ्या हंगामात चांगले पीक घेण्यासाठी आतापासून उपाययोजनांसह नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी फरदड पिकांचा मोह टाळण्याचा संकल्प करून कपाशीचे पीक उपटून फेकण्याचा निश्चय केला. यावेळी सचिन गायकवाड, पांडुरंग जऱ्हाड, दिलीप कढवणे, अमोल गायकवाड, गणेश कढवणे, सचिन कढवणे, योगेश कढवणे, दत्ता कढवणे, सचिन ताठे, पंडित मालुसरे, भगवान बोर्डे, संजय कढवणे आदींची उपस्थिती होती.