वीजग्राहकांची गैरसोय
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शासकीय, निमशासकीय कामावर परिणाम होत आहे, शिवाय शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
हाताडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
आंबा : परतूर तालुक्यातील हाताडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २५० ग्रामस्थांची बीपी, शुगर, रक्त आदी विविध प्रकारची तपासणी करण्यात आली, तसेच गरजूंना औषधोपचाराचे वाटप करण्यात आले. शिबिरासाठी डॉ.श्यामकुमार सुरेश, सरपंच मधुकर झरेकर व इतरांनी परिश्रम घेतले. यावेळी मदन बोरकर, राजाराम गाढवे, दुर्वास फटिंग, मारोती बोरकर, शाम झरेकर, किशन बोरकर, बाळू फटींग, विलास बोरकर, गोविंद बोरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मराठा आरक्षणाबाबत शिवणगाव येथे ठराव
घनसावंगी : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवणगाव येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेण्यात आला. हा ठराव आता शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दुचाकीचे चालक ओलांडतायत वेग मर्यादा
जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चालविणारे अनेक दुचाकी चालक वेग मर्यादा ओलांडून दुचाकी धूमस्टाईल पळवित आहेत. अनेक दुचाकी चालकांनी सायलन्सर काढून टाकल्याने कर्णकर्कश आवाज येत आहे, शिवाय अनेक दुचाकींचे नंबर प्लेटही गायब झालेले आहेत. त्यामुळे वाहतूक नियम माेडणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.